अमिर्झा - नदीपरीसरात पार्टी केल्यानंतर नदीच्या पात्रात आंघोळीकरीता उतरलेल्या महावितरण कंपनीच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना चातगांव- खुर्सा नजीकच्या कठाणी नदीपात्रात जलसमाधी मिळाल्याची घटना काल २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली होती. यापैकी चंद्रकांत वसंत ठाकरे (३२) रा. काटली ( साखरा ) याचे प्रेत सापडले. मात्र मिलींद सिताराम चौधरी (३३) रा. याचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काल काही कंत्राटी कर्मचारी पार्टी करण्यासाठी गेले होते. जेवणानंतर आंघोळीसाठी नदीच्या पात्रात उरतले असता दोघांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रेतांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस मुख्यालयी असलेली मोटार वाहन विभागाची बोट, स्थानीक पोलिस, एसडीआरएफचे जवान शोध मोहीम राबवित आहेत. मात्र अद्यापही मिलींद चौधरी याचे प्रेत आढळले नाही. गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.