बोध कथा घोडा आणि शेतकरी.
एके दिवशी एका शेतकऱ्याचा घोडा शेतातल्या कोरड्या विहिरीत पडला,जखमी झाल्यामुळे तो मोठ्याने ओरडत होता.लोकं जमा झाले शेतकरी धावत आला त्याने बराच विचार केला फार प्रयत्न केले.त्या घोड्याला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले,पण काही करता त्याला बाहेर काढणे जमत नव्हते.दिवस मावळायला आला होता.शेतकरीही आता थकला होता आणि कंटाळला होता त्याने विचार केला.आता हा घोडातर तसाही म्हातारा झाला आहे असेही निरुपयोगी आहे.आणि ती विहिरही कोरडीचं आहे.त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे.विहीरीत माती लोटावी.घोड्याचा प्रश्न ही सुटेल आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.मग काय जमलेल्या सर्व लोकांकडून त्याने मदत मागीतली.आणि सगळे कामाला लागले,कुदळ फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली.मध्ये पडलेल्या त्या जखमी घोड्याला काही कळेनासे झाले.
विहीरीत पडल्याने शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली.त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला.ते दुखा:ने अजून मोठयाने ओरडू लागला वरुन माती पडतचं होती.काही वेळाने घोड्याचा ओरडण्याचा आवाज थांबला.सागळ्यांना वाटले घोडा मेला बहुतेक शेतकऱ्याने सहज विहीरीत डोकावून पाहीले,तर तो पहातचं राहीला.अंगावरची माती झटकत घोडा उभा राहीला होता.लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले.परत पाहीले तर घोडा त्याचा तोच मग्न होता तो वरुन माती पडली की, झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर उभा रहायचा.असं करता करता कोरडी विहीर बरीचं भरली आणि कठडा जवळ येताचं तो घोडा तो कठडा ओलांडून बाहेर आला.
आयुष्यात वेगळे तरी काय होतं ?.आपण खड्यात पडलो तर,आपणास काढायला कोणीतरी एकचं येते, पण आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात पडल्यावर माती लोटणारे आपल्याला गाडण्याचा प्रयत्न करणारे बरेचं भेटतात.म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा.आपले डोके नेहमी शांत ठेवा समस्या कीतीही मोठी असो.शांत मनाने ती हाताळा.खड्ड्यात,पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल दुखः करण्यापेक्षा,त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा.झटका ती माती आणि त्या मातीची एक एक पायरी करत.हळूहळू यश प्राप्ती करीता वर या.मस्त रहा,आनंदी जगा....हेच जीवनाचे सार आहे.
भन्ते शाक्यपुत्र राहुल ९८३४०५०६०३,पैठण