चारित्र्याच्या संशयापोटी पतीने पत्नीची विहिरीत ढकलून हत्या


गडचिरोली: 

जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे चारित्र्याच्या संशयापोटी पतीने पत्नीची विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना 29 एप्रिल रोजी घडली व ती 1 मे रोजी उघडकीस आली.

खुशी महानंद सरकार वय 18 वर्ष असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव असून महांनंद सरकार असे आरोपी पतीचे नाव आहे. श्रीनगर येथील महानंद सरकार याचे चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथील खुशी हिच्यासोबत चार महिन्यापूर्वी विवाह झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरू असतानाच पती महानंद याने पत्नी खुशी हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरवात केली. त्याच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले आणि त्याने 29 एप्रिल ला स्वतःच्या शेतातील विहिरीत पत्नी खुशीला ढकलून दिले. तसेच त्या विहिरीत कीटक नाशक सुध्दा टाकले. आणि मुलचेरा पोलिस स्टेशन गाठून पत्नी घरून परस्पर निघून गेल्याच्या बनाव करीत तक्रार केली. आणि एक मे रोजी स्वतःच पोलिस ठाण्यात विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. मुलचेरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली व आपल्या खाक्या दाखवताच महानंद याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर मुलचेरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. आरोपी महानंद याला अटक केली व त्याच्यावर गुन्हा दाखल केला.