यवतमाळ:येथे लग्नाला आलेल्या पाहुण्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली असून यात दोन लहान मुलांसह 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिराजवळ घडली आहे. आगी मोहोळ मधमाशांच्या पोळाला कोणीतरी दगड मारल्यामुळे मधमाशांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिराजवळ लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नसोहळ्याला नवरी आणि नवऱ्याकडील पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लग्न लागल्यानंतर सर्व पाहुणे जेवायला बसले आणि त्याच दरम्यान पाहुण्यांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला आणि सर्व वऱ्हाडी मधमाशांपासून बचावासाठी इकडे तिकडे धावू लागली.
अनेकांनी बचावासाठी नाल्याच्या पाण्यात उड्या मारल्या. तर काही जण जंगलात पळाले. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 50 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांसह अनेक महिलांचा समावेश आहे